आरक्षण वाचविण्यासाठी वंचितच्या उमेदवारांना निवडून देऊन सभागृहात पाठवावे - ॲड प्रकाश आंबेडकर
देशभक्त न्युज - धाराशिव प्रतिनिधी / -
मागील लोकसभा निवडणुकीमध्ये आरक्षण बदलणार असे म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टी व त्यांच्या मित्र पक्षांना मतदारांनी चाप दिला आहे. त्यामुळे संविधान वाचले आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने मागणी नसताना आरक्षणाचे उपवर्गीकरण व क्रीमिलिअर बंधन करण्याचा निर्णय दिला आहे. मात्र त्याला वंचित बहुजन आघाडीसह इतरांनी विरोध केल्यामुळे ते क्षणापर्यंत थांबलेले आहे. त्यामुळे या विधानसभेत निवडणुकीच्या माध्यमातून विधान सभेच्या सभागृहामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सिलेंडर म्हणजेच वंचितचे आमदार जर दिसले नाहीत तर पुन्हा आरक्षण दिसणार नाही अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे आरक्षण वाचविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनाच निवडून देऊन विधानसभा सभागृहात पाठवावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी दि.१० नोव्हेंबर रोजी केले.
धाराशिव शहरातील सिद्धाई मंगल कार्यालयात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बी.डी शिंदे, शितल शिंदे, ॲड के.टी. गायकवाड, विकास बनसोडे, डॉ नितीन ढेपे, मिलिंद रोकडे, जीवन कदम, उमेदवार ॲड प्रणित डिकले (धाराशिव), डॉ स्नेहा सोनकाटे (तुळजापूर), राम गायकवाड (उमरगा) आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ॲड आंबेडकर म्हणाले की, आरक्षणामुळे एससी एसटी ओबीसी आदींसह वंचित घटकांना मान सन्मान मिळत आहे.
मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान वाचले असून आता आरक्षण धोक्यात आहे. संविधानाच्या कलम १५ नुसार महिला व मागास घटकांना समानतेचा अधिकार मिळाला आहे. तर कलम १६ नुसार एससी एसटी ओबीसी यांना संवैधानिक आरक्षणाची तरतूद आहे. मात्र आरक्षण विरोधी असलेले भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आरक्षण संपवायला निघालेले आहेत. १९८९ साली तत्कालीन प्रधानमंत्री स्व. व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोग लागू करून ओबीसींना आरक्षण लागू केले. मात्र हे आरक्षण एका कुटुंबाने घेतले तर पुन्हा त्या कुटुंबाला आरक्षणाचा फायदा घेता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी हे सरकार आतुर झालेले असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या ओबीसींचे राजकीय आरक्षण न्यायालयीन प्रक्रियेमुळे धोक्यात आले असून उर्वरित आरक्षण देखील ही प्रस्थापित मंडळी घालविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रस्थापित मंडळी पुन्हा निवडून येण्यासाठी धनशक्तीचा वापर करीत आहेत मात्र या प्रलोभनाला कोणीही बळी न पडता आपल्या हक्कासाठी व सुरक्षित भवितव्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन ॲड आंबेडकर यांनी केले. या सभेस महिला, पुरुष व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
