४५ दिवसांपासून अल्पवयीन मुलगी बेपत्ता
कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा !
वंचित बहुजन आघाडीचा तीव्र आंदोलनाचा इशारा
देशभक्त न्युज - धाराशिव प्रतिनिधी / -
लोहारा येथून अल्पवयीन मुलगी गेल्या ४५ दिवसांपासून बेपत्ता आहे. जिल्हा अधिकारी व पोलीस अधीक्षक यांना भेटून तात्काळ मुलीचा शोध जेव्हा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ऍड.अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने दि.२६ फेब्रुवारी रोजी केली आहे. त्या मुलीचा लवकरात लवकर शोध घेऊन करून त्या मुलीला व नातेवाईकांना न्याय द्यावा. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने दिले आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील सांगवी या येथील राहणारे गोसावी समाजाचे बाबू जाधव हे उदरनिर्वाहासाठी धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात रहात होते. फिरस्ती विक्री करणे हा त्यांचा व्यवसाय आहे. लोहारा शहरात छोटीशी झोपडी घालून शहरांमध्ये फिरस्ती अत्तर विकून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या घरी दोन मुले आणि तीन मुली असा त्यांचा परिवार आहे. ते भटक्या समाजाचे असून उदरनिर्वाहासाठी सगळीकडे फिरून अत्तर विकावे लागते. दि. १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी मोठी मुलगी किराणा सामान आणण्यासाठी घराबाहेर गेली. मात्र, ती दिवसभर घरी परतली नाही. आई-वडिलांनी सर्वत्र शोध घेतला. नातेवाईकांशी संपर्क साधला तरीही तिचा पत्ता लागला नाही. अखेर लोहारा पोलीस ठाण्यात आई वडीलांनी तक्रार दाखल केली. संबंधित किराणा दुकानदाराने दिलेल्या माहितीनुसार, मुलीने त्यांचा फोन वापरून एका मुलाशी संपर्क साधला आणि तो मुलगा तिला तेथून घेऊन गेल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. ती मुलगी १२ वर्षे ९ महिने वयाची असून अल्पवयीन आहे. त्यामुळे संबंधित मुलाचा तात्काळ शोध घेऊन कठोर कारवाई करावी. मुलीचा शोध लागला नाही तर धाराशिव येथे मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा यांनी दिला.
यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, धाराशिव जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के, महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा लोखंडे, युवकाध्यक्ष शितल चव्हाण, जिल्हा महासचिव नसीर शेख, जिल्हा उपाध्यक्ष महादेव एडके, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब अंदुरकर, विधी सल्लागार ऍड.के.टी. गायकवाड, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख कुंदन वाघमारे, जिल्हा संघटक कश्यप बनसोडे, युवक सदस्य जीवन कदम, मिलिंद रोकडे, मच्छिंद्र जाधव, अक्कलकोट तालुकाध्यक्ष विशाल ठोंबरे, विद्यार्थी संघटना राज्य प्रवक्ता रविराज पोटे, यशवंत इंगळे, हनुमंत जाधव तसेच धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

